वाशिम : जुलै पाठोपाठ ऑगस्ट महिन्यामध्येही पावसात सातत्य कायम आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे विदर्भातही (Heavy Rain) पावसाचा जोर वाढला आहे. सततच्या पावसामुळे (Kharif Crop) खरिपातील पिके तर पाण्यात आहेतच पण आता यामधून पदरी उत्पादन पडते की नाही अशी स्थिती झाली आहे. हंगामाच्या सुरवातीला पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली होती. तर आता अधिकच्या पावसामुळे तीबार पेरणी करावी लागली आहे. असे असतानाही शेतशिवारात पाणी साचल्याने उत्पादन बेभरवश्याचे झाले आहे. त्यामुळे आता पंचनामे आणि सर्व्हेक्षणचा सोपास्कार न करता थेट (Compensation) नुकसानभरापाई द्यावी अशीच मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. पेरणी झाल्यापासून पावसामध्ये सातत्य असल्याने खरीप हंगाम धोक्यात आहे. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर च्या खरबी-पिंप्री,धोत्रा परिसरातील अडाण नदीला मोठा महापूर आल्याने नदी काठावरील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली बुडाली आहे.

अडाण नदीला महापूर

तब्बल महिन्याभरापासून पावसामध्ये सातत्य असल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे. शिवाय आता पाऊस झाला की थेट त्याचा परिणाम नदी क्षेत्रावर होत आहे. मंगरुळपीर च्या खरबी-पिंप्री,धोत्रा परिसरात अधिकचा पाऊस झाल्याने अडाण नदीला पूर आला होता. एवढेच नाही तर नदीचे पात्र सोडून किमान अर्धा किलोमिटरपर्यंत पाणी वाहत होते. त्यामुळे पिकेच पाण्यात असे नाही तर अनेक ठिकाणी पिकासह शेतजमिनीही खरडून गेल्या आहेत. त्यामुळे आता कोणतीही औपचारिकता न करता थेट आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान

मराठावाड्याबरोबर आता विदर्भातही सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होत आहे. गतवर्षी झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दिली मात्र, गतवर्षी हंगामाच्या अंतिम टप्प्यात तरी नुकसान झाले होते यंदा सुरवातीलाच न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. रब्बीत उत्पादन घटले आणि खरिपात पिकेच पाण्यात आहेत. त्यामुळे शेती व्यवसाय करावा तरी कसा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

हजारो हेक्टरावरील पिके पाण्यात

खरीप हंगामातील पिके ही पावसावरच अवलंबून असतात. मात्र, पाऊसही माफक झाल्यास उत्पादनात भर आणि पीक पद्धतीमध्ये बदल असे दोन्हीही उद्देश साध्य करता येतात. यंदा मात्र सर्वकाही पाण्यात आहे. अडाण नदीला पूर आल्याने तब्बल हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिके ही पाण्यात आहेत. त्यामुळे आता कोणतीही औपचारिकता न करता मदतीची मागणी शेतकरी करीत आहेत.

Leave a Reply